जालना शहराचा महापौर भाजपाचा करा, शासनाकडून शहरातील नागरिकांना मोफत पीआर कार्ड देण्यात येईल – ना. चंद्रशेखर बावनकुळे

जालना/प्रतिनिधी,दि.10
जालना शहराचा पहिला महापौर हा भारतीय जनता पार्टी चा करण्यासाठी शहरातील भाजपाच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, भाजपाचा पहिला महापौर झाल्यास मी पहिल्याच बैठकीमध्ये शहरातील नागरिकांना शासनाची कोणतीही फीस न घेता मोफत पीआर कार्ड देणार असल्याचे मत महसूलमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी जालना शहरातील भाजपाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ वीर सावरकर चौक व छत्रपती संभाजी महाराज उद्यान (मोतीबाग) येथील आयोजित प्रचार सभेत केले.
यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा जालना महानगरपालिका निवडणूक प्रभारी रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर, आ.संतोष पाटील दानवे, महानगरपालिका निवडणूक प्रमुख माजी आमदार कैलासजी गोरंटयाल, भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर, प्रदेश निमंत्रित सदस्य रामेश्वर भांदरगे, राजेशजी राऊत, अशोक पांगारकर, बद्रीनाथ पठाडे, धनराज काबलिये आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मतदारांशी संवाद साधतांना ना.बावनकुळे म्हणाले की, हि निवडणूक पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, यांच्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध विकास योजना जालना शहरात राबविण्यासाठी अत्यंत महत्वाची निवडणूक असून, विकासाच्या चारचाकाची गाडी केंद्रातील मोदी सरकार, राज्यातील देवेंद्रजी फडणवीस सरकार व माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे व माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर, महानगरपालिका निवडणूक प्रमुख माजी आमदार कैलासजी गोरंटयाल, भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या नेतृत्वाखाली हि जालनेकरांना पुढे नेण्यासाठी भाजपाच्या सर्व उमेदवारांना विजयी करून विकास कामात मतदारांनी सहभाग नोंदवावा तसेच जालना शहरातील नागरिकांनी महापालिकेत भाजपाची सत्ता दिल्यास गायरानावरील व अतिक्रमण झालेल्या नागरिकांना कोणतीही शासकीय फीस न घेता मोफत पिआर कार्ड देण्यात येईल. जालना महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यास पहिला ठराव पीआर कार्ड मोफत देण्याबाबतचा घेऊन तो मी मुख्यमंत्री महोदयांकडून एक महिन्याच्या आत मंजूर करण्यात येईल. जालना शहरातील मालमत्तेची रक्षण करण्याची जबाबदारी हि भाजपा सरकारची. जालना शहरात पंधरा हजार घरे केंद्र शासनाकडून मोफत देण्यात येईल. तसेच प्रत्येक घराला प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा लाभ देण्यात येईल व त्याची शासनाकडून सूर्यघर त्याचे पंधरा वर्षा पर्यंत बिल येणार नाही. त्यामुळे जालना शहराच्या विकासासाठी तुम्ही भाजपाच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे, मी विकास कामासाठी जालना शहराला निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आवाहन ना.बावनकुळे यांनी केले.
यावेळी प्रभाग क्र.७ चे भाजपाचे अधिकृती उमेदवार राजेश राऊत, सुनील खरे, पार्वती देशमाने, स्नेहलता कामड तसेच प्रभाग क्र. १४ मधील अधिकृत उमेदवार सौ. रमा काळे, अशोक (लक्ष्मीकांत) पांगारकर, सुलोचना गोर्डे, शशिकांत घुगे आदींसह प्रभागातील मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.


