रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत आयोजित रॅलीची जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते सुरुवात
जालना/प्रतिनिधी,दि.02
जिल्ह्यात 1 ते 31 जानेवारी या कालावधीत ‘रस्ता सुरक्षा अभियान’ राबविण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती व्हावी यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीला जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली.
यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन कृष्णा चिंतल यांच्यासह प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती.
1 ते 31 जानेवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जिल्ह्यात उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस, शिक्षण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने रस्ता सुरक्षाविषयक बॅनरद्वारे जनजागृती करणे, शाळा, महाविद्यालयात रस्ता सुरक्षाविषयक व्याख्यान आयोजित करणे, रस्त्यावरील बैलगाडी, ट्रॅक्टर आणि ट्रॉली वाहनांना परावर्तिका (रिफलेक्टर) लावणे, वाहन चालकांची आरोग्य तपासणी करणे, मोटार ड्रायव्हींग स्कूल कार्यशाळा आयोजित करणे तसेच जिल्ह्यातील रस्ते अपघातास कारणीभूत बाबींची तपासणी करणे आदी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.



