नुकसान भरपाई साठी मच्छीमार बांधव व शेतकऱ्यांनी घेतली आ. महेंद्रशेठ दळवी यांची भेट.
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.8
दिनांक ८ जुलै रोजी एमएसआरडीसीचे आयुक्त अनिलकुमार गायकवाड यांच्या सोबत करंजा रेवस ब्रिज संदर्भात बाधित शेतकरीवर्ग आणि मच्छिमार बांधव यांना मिळणारा मोबदला आणि नुकसान भरपाई यांच्यासह इतर मागण्यांबाबत चर्चा करण्या करीता अलिबाग मुरुड मतदारसंघातील आमदार महेन्द्र दळवी यांच्या पुढाकारातून बैठक आयोजित करण्यात आली होती. करंजा रेवस पुलाच्या कामा संदर्भात मच्छिमार आणि शेतकरीवर्ग यांना नुकसान भरपाई आणि मोबदला मिळण्या करीता चाणजे ग्रामपंचायत सरपंच अजय म्हात्रे,माजी सभापती सागर कडू,माजी जिल्हापरिषद सदस्य सिताराम नाखवा, सामाजिक कार्यकर्ते सचिन रमेश डाऊर, कुंदन नाखवा आदी मान्यवरांनी आमदार महेंद्रशेठ दळवी यांची भेट घेऊन ही समस्या त्वरित सोडविण्याची मागणी केली.येत्या आठवडयात उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात येणार आहे.असे सांगत महेंद्रशेठ दळवी यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले.


