बालविवाह निर्मुलनासाठी प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन

जालना/प्रतिनिधी,दि.31
शासनाकडून बालविवाह मुक्त भारत पोर्टल सुरु करण्यात आले असून हे सर्व नागरिकांसाठी खुले आहे. तरी बालविवाह मुक्त भारत पोर्टलवर जाऊन https://stopchildmarriage.wcd.gov.in या लिंकवर क्लिक करुन बालविवाह निर्मुलनाची प्रतिज्ञा घ्यावी व प्रतिज्ञा घेतल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करुन या मोहिमेमध्ये नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नु पी.एम. यांनी केले आहे.
जिल्ह्यात दि.16 ऑक्टोबर 2025 ते दि.26 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये बालविवाह मुक्त भारत अभियान 100 दिवस जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडुन राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जालना जिल्ह्यात बालविवाहाचे समुळ उच्चाटन व्हावे या अनुषंगाने प्रशासनाकडुन जनजागृती करण्यात येत आहे. बालविवाह थांबविण्याकरीता 24 तास 1098 ही चाईल्ड हेल्पलाईन सेवा सुरु आहे. तसेच प्रशासनासोबतच प्रत्येक नागरिकांनी देखील बालक, बालिका यांचे शारीरिक, मानसिक आरोग्य तसेच बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी बाल विवाह होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. यासाठी सर्व स्तरावरुन सर्वांनी बालविवाह मुक्त भारत करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणुन बालविवाह मुक्त भारत पोर्टल सुरु करण्यात आले आहे. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.


