मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेतंर्गत १०३२ कर्ज प्रकरणांची बँकेकडे केली शिफारस
जालना/प्रतिनिधी,दि. 5
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या अंमलबजावणी बाबत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी वेळोवेळी घेतलेल्या आढावा बैठकीत बँक व्यवस्थापकांना वाटप केलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानूसार मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यासाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता १३०० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत १०३२ कर्ज प्रकरणांची बँकांकडे शिफारस करण्यात आली आहेत. त्यापैकी २२२ कर्ज प्रकरणे बँकांकडून मंजूर केलेली असून आज रोजी बँकांकडे ६५१ प्रकरणे मंजुरीसाठी प्रलंबित आहेत.
राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगाराच्या व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरूप वाव देणारी सर्वसमावेशक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) ही योजना उद्योग संचालनालयाअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येते. प्राप्त कर्ज प्रकरणांच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी ग्रामीण व शहरी तरुणांनी जास्तीत जास्त अर्ज योजनेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावेत. (www.maha-cmegp.gov.in) जिल्ह्यातील सर्व बँक व्यवस्थापक यांनी छाननी करून संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या कर्ज प्रस्तावांना त्वरित कर्ज मंजुरी देऊन उद्दिष्ट पूर्तीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक योगेश सारणीकर यांनी केले आहे.


