थंडी आणि अंधारापूर्वीच मतदानाचा हक्क बजावावा;ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग मतदारांना निवडणूक अधिकारी अशीमा मित्तल यांचे आवाहन
● हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे नियोजन ●15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते 5.30 कालावधीत होणार मतदान ● मतदार केंद्रापर्यंत जाण्यासाठी दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा

जालना/प्रतिनिधी,दि.12
जालना शहर महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीमध्ये समाजातील प्रत्येक घटकाने आपला मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. विशेषतः वयोवृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी श्रीमती अशीमा मित्तल यांनी ज्येष्ठ मतदारांना सकाळीच मतदान केंद्रावर जाऊन आपला हक्क बजावण्याचे विशेष आवाहन केले आहे.
वेळेचे नियोजन आणि हवामानाचा अंदाज:
महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने सायंकाळच्या वेळी थंडीचे प्रमाण वाढते आणि सूर्यास्तामुळे लवकर अंधार पडतो. ही बाब विचारात घेता, ज्येष्ठ नागरिक आणि वयोवृद्ध मतदारांनी सायंकाळपर्यंत न थांबता, सकाळच्या सत्रातच मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदान करावे, जेणेकरून त्यांना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.
प्रशासकीय प्रतिपादन :
श्रीमती अशीमा मित्तल यांनी या संदर्भात बोलताना सांगितले की, “ज्येष्ठ नागरिक हे लोकशाहीचे स्तंभ आहेत. त्यांचा सहभाग या निवडणुकीत अत्यंत मोलाचा आहे. थंडीच्या दिवसांत सायंकाळी होणारी गर्दी आणि कमी होणारा प्रकाश यामुळे वयोवृद्ध मतदारांना चालणे किंवा रांगेत उभे राहणे कठीण जाऊ शकते. त्यामुळे सर्व ज्येष्ठ बांधवांनी सकाळी लवकर मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे.”
मतदान केंद्रांवर विशेष सुविधा:
ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये एक व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आलेली आहे, प्राधान्याने प्रवेश, बसण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देशही निवडणूक विभागाने दिले आहेत. तसेच प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे अधिपत्याखाली प्रत्येक प्रभागात 02 ऑटो रिक्षा उपलब्ध करून देण्यात आल्या असुन, अशा एकूण 10 ऑटो रिक्षा महापालिकेमार्फत जेष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांकरीता उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. 15 जानेवारी रोजी जास्तीत-जास्त नागरिकांनी घराबाहेर पडून शांततेत मतदान करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


