मोर्शी तालुक्यात वक्रदृष्टी: पाचव्या दिवशीही पाऊस; रस्ते जलमय
मोर्शी ता. /प्रतिनिधि,दि.20
गेल्या चार दिवसांपासून कधी अधून-मधून तर कधी सतत बरसणाऱ्या पाऊसधारांनी मोर्शी भागाला मंगळवारी ही दणका दिला. पावसामुळे खेडी नाल्याला मोठा पूर आला होता निंभार्णी ते राजुरावाडी भागातील रस्ते जलमय झाले होते . तिवसा तालुक्यातील मोझरी व इतर भागांतील शेते पाण्याखाली आली असून ही काही शेतांमधील पिके खरडून गेली आहेत. इतर गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी आहेत.तिवसा तालुक्यातील सालोरा, वऱ्हा, शिरजगाव मोझरी, अनकवाडी या गावांमधील कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. राज्य शासनाच्या निर्देशानुसार महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत नुकसानीचे सर्वेक्षण केले जात आहे. तिकडे सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान काल झालेल्या मुसळधार पावसामुळे टाकरखेडा-आष्टी मार्ग पूर्णतः जलमय झाला असून रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांची दमछाक होत आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांना रस्ता दिसेनासा झाला आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन पाणी उपसा करण्याची मागणी परिसरातील नागरिक व वाहनचालकांकडून होत आहे.मोर्शी तालुक्यात ढगफुटीसदृश झालेल्या पावसामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले. अतिवृष्टीमुळे निंभारणी, राजुरवाडी, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कापूस, सोयाबीन, मूग यासारख्या पिकांचे नुकसान झाले असून, शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. नाल्यांना पूर आला असून काही रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मोझरी तिवसा येथिल अनेक भागांचा वीज पुरवठाही खंडित झाला होता अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरून निघण्यास वेळ लागणार असून, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने त्वरित पावले उचलण्याची गरज असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे. सोमवारी पावसामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला. होता या पावसाचा फटका ग्राम विकासाचा डोलारा सांभाळणाऱ्या जिल्हा परिषद मुख्यालयालाही बसला. दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे येथील वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे काही काळ अख्खे मिनी मंत्रालय काळोखात बुडाले होते. जि. प.ची बरीचशी कार्यालये दाटी-वाटीची असल्याने काही कार्यालयात तर अक्षरश: अंधार पसरला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती.


