कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसेल का ?
शिक्षक मित्र वक्तृत्व स्पर्धेत, स्पर्धकाचे परखड मत ..!
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.5
जालना येथील १०० शिक्षक क्लबच्या वतीने नवरात्रोत्सवाचे नऊ शैक्षणिक उपक्रम,सामाजिक बदलासाठी – एक पाऊल या उपक्रमांतर्गत विविध शालेय उपक्रम घेण्यात आले. त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे शिक्षक मित्र वक्कृत्व स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी रविवार दि. २८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती परंतु अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. ती स्पर्धा दि.५ ऑक्टोबर रोजी जालना शहरातील ज्ञान संजीवनी फाउंडेशनच्या इंग्लिश स्कूलमध्ये पार पडली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ तथा शाळेचे संस्थापक डॉ.बळीराम बागल हे तर उद्घाटक म्हणून विचारवंत एम. जी. जोशी यांच्यासह डॉ. शिवनंदा मेहेत्रे, सुभाष पारे, आप्पासाहेब मुळे, विवेक कुलकर्णी व शिक्षक क्लबचे अध्यक्ष राजेभाऊ मगर यांची उपस्थिती होती.
तत्पूर्वी दीप प्रज्वलाने कार्यक्रमाची मान्यवरांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली व या वर्षीचा राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जालना येथील आदर्श शिक्षक विवेक कुलकर्णी यांना मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. व स्पर्धेच्या अनुषंगाने उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
शिक्षक मित्र वक्तृत्व स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता. या स्पर्धेसाठी ४० शाळातील ७६ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. यापैकी प्रत्यक्ष स्पर्धेसाठी ३५ शाळातील ६४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता नव्या युगाचा आविष्कार, छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले – एक ऐतिहासिक वारसा, माझं शहर माझी जबाबदारी, भारतीय सण उत्सव एकात्मतेचे प्रतिक व विद्यार्थी विकासात शिक्षणाचे महत्त्व या विषयावर वरील सहभागी विद्यार्थ्यांनी आपापले परखड व अभ्यासपूर्ण मते मांडून परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. यात प्रामुख्याने कृत्रिम बुद्धिमत्ता शेतकऱ्यांचे अश्रू पुसेल का ? या प्रश्नाने उपस्थितीतांचे डोळे पाणावले तर भारतीय सण उत्सवाच्या माध्यमातून वाढत चाललेली सामाजिक दरी कमी होईल का वा छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या ताकतीने निर्माण केलेले स्वराज्य व त्या स्वराज्याची साक्ष व महती सांगणारे गडकिल्ले जतन संवर्धनात प्रत्येक नागरिकांनी योगदान द्यावे असे मुद्दे मांडले.वक्कृत्व स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षण करण्यासाठी परीक्षक म्हणून डॉ.शिवनंदा मेहेत्रे,प्रा. डॉ.यास्मिन शेख, प्रा. चंद्रकांत धोत्रे, साजिद खान पठाण,प्रा. विलास गुजर व नारायण राजेभोसले यांची उपस्थिती होती. सहभागी झालेल्या व वक्तृत्व स्पर्धा निकष पात्र ठरवून विजयी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे होत माध्यमिक विभाग,प्रथम क्रमांक सायली रवींद्र जोगदंड (सी.टी.एम.के. विद्यालय, जालना) द्वितीय क्रमांक विभागून वीरेंद्र बाळासाहेब कासारे (पी.एम. श्री जि. प. प्रशाला, नेर) व प्राची योगेश गडकर ( जे.बी.के. विद्यालय, टेंभुर्णी ) तृतीय क्रमांक ऋतुजा निवृत्ती भोंडे (पद्मभूषण बारवाले प्राथमिक विद्यालय, मांडवा ) तर उत्तेजनार्थ दिव्या हर्षवर्धन वाहुळकर ( कै. बाबुराव जाफ्राबादकर माध्यमिक विद्यालय, जालना ) आणि
प्राथमिक विभागातून
प्रथम क्रमांक विभागून स्वराज ज्ञानेश्वर उखर्डे ( रामानुज इंग्लिश स्कूल, टेंभुर्णी ) व सई शिवाजी डोंगरे ( राजुरेश्वर विद्यालय, कर्जत ) द्वितीय क्रमांक : आस्था अंकुश ढसाळ ( शांतिनिकेतन विद्यामंदिर, जालना) तृतीय क्रमांक : गायत्री बाबासाहेब मदन (कै. नानासाहेब पाटील विद्यालय, नजीक पांगरी) तर
उत्तेजनार्थ : शिवानी दिलीप पारखे ( प्रतिभा विद्यालय, काजळा)
कार्यक्रमाचे बहारदार संचलन साजिद पठाण यांनी तर आभार संदीप इंगोले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप इंगोले, अशोक माधवले, मंदाकिनी खलसे, रामेश्वर धोपटे लक्ष्मण कुऱ्हाडे व राजेभाऊ मगर यांनी परिश्रम घेतले.


