भवरोगावर प्रभावी औषध म्हणजे ब्रह्म रसाचा काढा होय- डॉ प्रमोद कुमावत

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.4
मी कोण आहे, माझे काय आहे व जीवनामध्ये माझे ध्येय काय आहे याचा गांभीर्याने विचार संतांनी केला आहे व आपण सर्वांनी करावा असे संत सांगतात. स्वतःला ओळखणे हीच खरी भक्ती आहे, सर्व संतांनी स्वतःला ओळखून ते सुखी झाले. म्हणून सर्व संत म्हणतात की प्रत्येकाने स्वतःला ओळखले पाहिजे तसेच संसाराचे खरे स्वरूप ओळखले पाहिजे हीच खरी भक्ती आहे असे प्रतिपादन बाबुलतारा येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह प्रसंगी कीर्तन करताना डॉ.प्रमोद महाराज कुमावत यांनी केले. ते ” ब्रह्म रस घेई काढा, जेणे पीडा वारेल,पथ्य नाम विठोबाचे आणिक वाचे न सेवी,भवरोग ऐसे जाय, आणिक काय क्षुल्लके, तुका म्हणे नव्हे बाधा, आणिक कदा भुतांची” या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरूपण केले.
या संसारामध्ये आपण कसे राहावे यासंबंधी बोलताना कुमावत महाराज म्हणाले की भवरोग हा मोठा रोग असून जन्म मरणाच्या दु:खामध्ये घालीत असतो म्हणून या रोगावर मोठे औषध म्हणजे ब्रह्म रसाचा काढा घ्यावा. अर्थात ब्रह्म ज्ञान हेच भवसागर पार पडण्याचे प्रभावी मार्ग आहे. मनात पाप, भ्रष्टाचार हा लोभामुळे होतो तर दु:ख हे मोहामुळे होते त्यामुळे या अंतःकरणातील विकारांचा त्याग करावा, परमेश्वराची भक्ती करावी, जगाला प्रेम अर्पण करावे यामुळे इहलोकातील सुख व परलोकातील सुख प्राप्त होते. आपण जे कर्म करतो त्या कर्मानुसार आपण जगत असतो आजचे जगणे हे कालच्या कर्मावर अवलंबून असते त्यामुळे मनुष्याने नेहमी चांगले कर्म, सत्कर्म केले पाहिजेत. संसारामध्ये आपण प्रयत्नवादी असले पाहिजे पण प्रयत्न करूनही जर आपल्याला इच्छित फलप्राप्ती होत नसेल तर त्याविषयी आपण दुःखी होण्याचे कारण नाही भगवद्गीते मध्ये भगवान सांगतात “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” माणसाला कर्मकार्यामध्ये अधिकार आहे परंतु फलामध्ये नाही त्यामुळे परमेश्वर जसे आपल्याला ठेवेल तसे आपण राहत असताना नेहमी समाधानी राहिलो पाहिजे. जैसी स्थिती आहे तैशा परी तू राहे कौतुक तू पाहे संचिताचे| असे तुकोबांनी म्हटले आहे.
संत दुनियादास महाराज यांच्या समाधीस्थळी दत्तजयंती उत्सव निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संत दुनियादास महाराज यांचे चरित्र लिहिणारे हभप संजय आण्णा काळे महाराज, हभप सचिन आबा लावनीकर महाराज,हभप आप्पासाहेब महाराज मुळे, अरुण काळे, पंचक्रोशीतील तरूण मंडळी, भाविक मंडळी,गुणीजन मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


