२१व्या शतकातील मुख्य कौशल्य म्हणजे संवाद कौशल्य होय. – बालसाहित्यिक डॉ. विशाल तायडे
"उत्तमपणे व्यक्त व्हायचं असेल तर वाचन वाढवा!"

जाफराबाद/विशाल देशमुख, दि.21
(दि. २०/१२/२०२५) जालना येथील १०० शिक्षक क्लब द्वारा आयोजित
शिक्षक मित्र वक्तृत्व स्पर्धा आणि युनेस्को जागतिक वारसा स्थळ यादीत समाविष्ट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गडकिल्ल्यावर आधारित सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली होती त्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्या प्रसंगी उद्घाटक म्हणून प्रसिद्ध बालसाहित्यिक तथा वरिष्ठ अधिव्याख्याता, राज्य आंग्लभाषा अध्यापन संस्था, छत्रपती संभाजीनगर डॉ. विशाल तायडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत मधुकर जोशी तर विशेष अतिथी म्हणून डॉ. श्रीहरी दराडे, बालासाहेब आबुज, राजेभाऊ मगर, प्रकाश कुंडलकर,दत्तात्रय राऊतवाड, डॉ.शिवनंदा मेहेत्रे,माया कवानकर व सुनीता गवई यांची उपस्थिती होती.
डॉ तायडे आपल्या पुढे म्हणाले की २१व्या शतकातील मुख्य कौशल्य म्हणजे योग्य रीतीने संवाद साधता येणे होय. ज्या व्यक्तीला उत्तम प्रकारे व्यक्त होता येते. आपले म्हणणे प्रभावीपणे मांडता येते, तिच माणसं आयुष्यात सफल ठरतात. आणि उत्तम रीतीने संवाद साधण्यासाठी चांगला वाचक असणे आवश्यक असते. वाचनामुळे तुम्हाला आपले विचार आणि आपले म्हणणे प्रभावीपणे आणि इतरांच्या मनाला भिडेल अशा पद्धतीने मांडता येणे शक्य होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच वाचण्याची आवड अंगी बाळगली पाहिजे.वेगवेगळ्या घटनांना सामोरे जात असताना जे विद्यार्थी वाचन प्रिय आहे त्या विद्यार्थ्यांना कुठे व कसे व्यक्त व्हायचं याची उत्तम जाणीव असते.
असेच विद्यार्थी भविष्यामध्ये उत्तम भारत घडवू शकतात आणि समाधानाने आयुष्य जगू शकतात.
शिक्षक समुहाचे अध्यक्ष राजेभाऊ मगर यांनी प्रास्ताविक करून समुह कार्याची ओळख व राबवत असलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच या स्पर्धांमध्ये राज्यातील ४८ शाळांतील पंचेचाळीसे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याची तसेच त्यातील गुणाणुक्रमे आलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आज संपन्न होत आहे अशी माहिती त्यांनी दिली. या स्पर्धा आयोजित करण्या मागची गरज व महत्त्व सांगितले. ही वक्तृत्व स्पर्धा केवळ स्पर्धा नसून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी साधन आहे. ही कला विद्यार्थ्यांना आत्मविश्वासू ,विचारशील व प्रभावी वक्ता बनवते.महाराजांचे गड-किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट होणे म्हणजे केवळ सन्मान नव्हे, तर इतिहासाचे शाश्वत संरक्षण,जागतिक पातळीवरील ओळख व भविष्यासाठी जबाबदार विकासाची ठोस दिशा मिळावी यासाठी या स्पर्धा आयोजित केल्याचे म्हटले तसेच येणाऱ्या काळात गडकिल्ल्यांवर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेऊन गुणानुक्रमे येणाऱ्या पहिल्या तीन विजेत्या विद्यार्थ्यांना सायकल भेट देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी
———————————————————
उपशिक्षणाधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल श्री. सुभाष भालेराव, श्री. संजय कायंदे व श्री गजानन वाळके यांचा फेटा, शाल सन्मानचिन्ह व हार बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
—————————————————————-
१०० शिक्षक क्लब ऑफ जालना मार्फत विद्यार्थी हितासाठी दरवर्षी अनेक उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा ,वादविवाद स्पर्धा इत्यादी. यामधून विद्यार्थ्यांचे गुण,कौशल्य विकसित होण्यासाठी एक व्यासपीठ मिळते.तसेच विद्यार्थ्यांना प्रेरणात्मक पारितोषिक सुद्धा दिल्या जातात. हे सर्व कार्य शंभर शिक्षक क्लबचे शिक्षक अतिशय सेवाभावी वृत्तीने करत आहेत ही शिक्षण क्षेत्रासाठी अतिशय गौरवशाली बाब आहे.
डॉ. श्रीहरी दराडे, अधिव्याख्याता – डायट, जालना.
कार्यक्रमाचा समारोप करतांना अध्यक्ष एम.जी. जोशी यांनी गडाच्या अभ्यासाशिवाय मोठे कार्य होऊच शकत नाही कारण ते महाराजांचे बोलते व जिवंत कार्य आहे. त्यासाठी सामान्य ज्ञान परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना गडकिल्यावर सखोल व विस्तृतपणे अभ्यास करायला लावणारा उपक्रम अनुकरणीय आहे. त्यासोबतच लिहुन वाचून चालणार नाही तर त्यासाठी पुढे होऊन बोलावेही लागेल त्यासाठी शिक्षक मित्र वक्तृत्व स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना बोलते केले पण बोलत असतांना विषयज्ञान, भाषा व देहबोलीकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे तसेच येणाऱ्या काळात नेतृत्व करायचे असेल तर वक्तृत्व यायला हवी असा गुरूमंत्र दिला. कार्यक्रमाचे बहारदार संचालन साजिद खान पठाण करून उपस्थितींना खेळवून ठेवले तर आभार संदीप इंगोले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक माधवले, विजय निकाळजे, चंद्रकांत धोत्रे, सुभाष पारे, अप्पासाहेब मुळे, राजेश शेवाळे, विलास जमधडे,लक्ष्मण कुऱ्हाडे, अमोल कंडारे,कविता दाभाडे मगर, शुभांगी लिंगायत, मंदाकिनी खलसे व सर्व पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.


