कृषी विभागाने गावनिहाय शिबिराचे आयोजन करुन ॲग्रीस्टॅक नोंदणी करावी – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

जालना/प्रतिनिधी,दि.30
शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळवून देण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजना अंमलात आली आहे. वेळोवेळी शेतकऱ्यांना फार्मर आयडी तयार करुन घेण्याचे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांचे कल्याण करणे हा कृषी विभागाचा मुळ विषय आहे. तरी ज्या शेतकऱ्यांची अद्यापही ॲग्रीस्टॅक नोंदणी प्रलंबित आहे, अशा शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने गावनिहाय शिबिराचे आयोजन करुन 10 दिवसाच्या आत नोंदणी पुर्ण करावी, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी बैठकीत दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, कृषी उपसंचालक एस.एच.कायंदे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, शेतीच्या आधुनिकीकरणासाठी व शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ पारदर्शक पध्दतीने मिळावा यासाठी ॲग्रीस्टॅक योजना लागू केली आहे. शेतकऱ्यांची नोंदणी होवून फार्मर आयडी मिळाला तरच पीएमकिसान योजनेसह अन्य शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकरी हितासाठी व कल्याणासाठी शासनाचा कृषी विभाग कार्यरत आहे. शेतकरी हिताची कामे कृषी विभागाने कोणत्याही परिस्थितीत प्राधान्याने करणे गरजेचे आहे. ॲग्रीस्टॅक योजनेचे काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे काम नाही, वेतन नाही ही पध्दत अवलंबिण्यात यावी.
जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना अद्यापही विम्याचे पैसे मिळाले नाहीत त्यांनी आपल्या बँक खात्याला आधार जोडणी पुर्ण करणे गरजेचे आहे, त्यामुळे 7 जानेवारी 2026 पर्यंत तालुका कृषी अधिकाऱ्यांनी मिशन मोडवर बँक खात्याला आधार जोडणीची कामे करुन प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी मदत करावी, अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. या बैठकीस उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.


