जिल्ह्यातील ६९३ ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर- – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

जालना/प्रतिनिधी, दि.30
जालना, केंद्र सरकारच्या WINDS (Weather Information Network Data System) प्रकल्पाअंतर्गत जालना जिल्ह्यातील ६९३ ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र (AWS – Automatic Weather Station) बसविण्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी दिली.
जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यात प्रत्येक गावात झालेल्या पर्जन्यमानाची अचूक व विश्वासार्ह आकडेवारी उपलब्ध होत नसल्याने, ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आला होता. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीकडून आवश्यक प्रस्ताव मागविण्यात आले होते.
जालना जिल्ह्यात एकूण ७९१ ग्रामपंचायती असून, त्यापैकी ४९ ग्रामपंचायतींमध्ये यापूर्वीच स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींपैकी ६७१ ग्रामपंचायतींमध्ये शासकीय जागेत, तर २२ ग्रामपंचायतींमध्ये भाडेतत्त्वावर जागा घेऊन स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
यासंदर्भातील सर्व प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले असून, ते शासनाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता यासह हवामानविषयक अचूक माहिती उपलब्ध होणार असून, शेती नियोजन, पीक विमा, आपत्ती व्यवस्थापन व शेतकऱ्यांच्या निर्णय प्रक्रियेस मोठा लाभ होणार असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी नमूद केले.


