निंभार्णी येथील शेतकऱ्यांवर बिबट्याचा हल्ला:परिसरातील शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण
मोर्शी/प्रतिनिधि,दि.30
मोर्शी तालुक्यातील निंभार्णी गावात पुन्हा एकदा बिबट्याच्या धुमाकुळामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावालगतच्या शेत शिवारात बिबट्याचा वावर वाढल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, सोमवारी दुपारी घडलेल्या घटनेत एका शेतकऱ्यावर बिबट्याने थेट हल्ला केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
निंभार्णी येथील संदीप नांदने हे शेतकरी बैल बंडी घेऊन नेहमीप्रमाणे आपल्या शेतात कामासाठी गेले असता, अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. अचानक झालेल्या या हल्ल्यात संदीप नांदने जखमी झाले. त्यांच्या आरडाओरडीनंतर परिसरातील शेतकरी घटनास्थळी धावून आले. त्यानंतर बिबट्या घटनास्थळावरून पळून गेला.जखमी अवस्थेत असलेल्या तात्काळ उपचारासाठी राजुरवाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे समजते. मात्र या घटनेनंतर निंभार्णी गावासह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.गावालगतच्या शेत शिवारात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. काही शेतकऱ्यांनी बिबट्या दिसल्याचे सांगितले होते, मात्र सोमवारी घडलेल्या प्रत्यक्ष हल्ल्यामुळे या चर्चांना दुजोरा मिळाला आहे. शेतात काम करणारे शेतकरी, मजूर तसेच गुरेढोरे चारणासाठी जाणारे नागरिक यांच्यात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून, वनविभागाने तातडीने दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा तसेच रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रतिकीया
वनविभाला कळवावे नागरिकांनी विशेषत पहाटे व संध्याकाळच्या वेळेत एकट्याने शेतात जाणे टाळावे, लहान मुले व जनावरे यांची काळजी घ्यावी, तसेच बिबट्या आढळल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात येत आहे. निंभार्णी परिसरात बिबट्याचा धोका वाढत चालल्याने, वनविभागाच्या तत्काळ व प्रभावी कारवाईकडे सर्वांचे लक्ष
लागले आहे.
कल्पनाताई कुरवाडे शेतकरी निंभार्णी,


