जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे 19 जानेवारी ते 23 जानेवारी 2026 या कालावधीत विशेष मोहिम
जालना/प्रतिनिधी,दि.14
सन 2025-26 व 2026-27 या शैक्षणिक वर्षात राज्य सामाईक प्रवेश परिक्षेच्या आधारे आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, विजा- अ, भज, इमाव, विमाप्र, एसईबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. त्यामुळे इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करण्याची कार्यवाही जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या स्तरावर सुरु आहे. त्या अनुषंगाने दि. 19 जानेवारी 2026 ते 23 जानेवारी 2026 या कालावधीत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी त्रुटी पुर्तता करणे विशेष मोहिम समिती कार्यालयामार्फत हाती घेण्यात आली आहे.
जात वैधता प्रमाणपत्र देण्याकरीता समितीस पुरेसा अवधी मिळवा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळण्यापासून वंचिम राहू नये, यासाठी विद्यार्थी विहित वेळेत समितीकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तसेच ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरीता समितीकडे अर्ज सादर केलेले नाहीत. त्यांनी ज्या जिल्ह्यातील जातीचा दाखला प्राप्त केलेला आहे त्या जिल्ह्याच्या प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरीता समितीकडे त्वरीत अर्ज सादर करावेत.
ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रस्ताव सादर केलेला नाही, अशा विद्यार्थ्यांनी www.bartievalidity.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज सादर करावेत व त्याची एक प्रत जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करावी. ज्या विद्यार्थ्यांचे जात पडताळणीचे अर्ज समितीकडे प्रलंबित आहेत व ज्यांना समितीने ऑनलाईन त्रुटी कळविल्या आहेत. अशा अर्जदारांनी अर्जातील त्रुटीची पुर्तता करण्यासाठी समिती कार्यालयात दि. 19 जानेवारी 2026 ते 23 जानेवारी 2026 या कालावधीत प्रत्यक्ष संपर्क करुन या विशेष मोहीमेचा लाभ घेण्याचे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती संगीता मकरंद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.


