राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमदान शिबिरांतर्गत मौजे रेपाळा येथे भव्य आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर संपन्न

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.15
सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जाफराबाद (जि. जालना) यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विशेष श्रमदान शिबिरांतर्गत ग्रामस्थांची आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर मोठ्या उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले.
या आरोग्य शिबिरात मार्गदर्शक डॉ. सौ. एस.आर. काळे(वैद्यकीय अधिकारी) व डॉ. आर. बी. खंडागळे यांनी उपस्थित ग्रामस्थांना आरोग्यविषयक सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश देशमुख हे उपस्थित होते. शिबिरामध्ये श्री. एस. एस. घायवट (आरोग्य सेवक), बी. व्ही. कराडे, एम. एम. सय्यद, सय्यद अबूजर, श्री.पी. ए. जेउघाले, श्रीमती भोपळे या वैद्यकीय कर्मचारी यांच्या सहकार्याने गावातील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक व युवकांचे हिमोग्लोबिन (हिमोग्लिन), रक्तदाब (बीपी) व रक्तातील साखर (शुगर) यांची तपासणी करण्यात आली.
तपासणीनंतर आवश्यकतेनुसार ग्रामस्थांना मोफत औषधोपचार देण्यात आले तसेच आजारांबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना, संतुलित आहार, नियमित व्यायाम व आरोग्यदायी जीवनशैली याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः महिलांमध्ये आढळणाऱ्या रक्ताल्पतेबाबत (हिमोग्लोबिन कमी असणे) जनजागृती करण्यात आली. अध्यक्षीय भाषणात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणारे सामाजिक उपक्रम हे ग्रामीण भागासाठी अत्यंत उपयुक्त असून आरोग्यविषयक उपक्रमांमुळे ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्यास मदत होते, असे प्रतिपादन केले. यावेळी उपप्राचार्य प्रा. डॉ. एस.एल. मेढे यांनीही विद्यार्थ्यांच्या सामाजिक सहभागाचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गावाचे सरपंच श्री गणेश शेळके, उपसरपंच दिलीप देव्हडे, शिक्षक गणेश गणेश देव्हडे, अमोल देव्हडे तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. शिवाजी जगतवाड, तसेच प्रा. मनीष बनकर, प्रा. डॉ. प्रदिप मिसाळ, प्रा. सरिता मणियार, श्री.अंकुश राठोड, श्री. ममराज पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. राष्ट्रीय सेवा योजनेचे सेवक विद्यार्थी शिबिराच्या संपूर्ण कालावधीत नियोजन, नोंदणी, तपासणी व्यवस्थापन व ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी सक्रियपणे सहभागी झाले.
या आरोग्य तपासणी शिबिरास ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून राष्ट्रीय सेवा योजना व महाविद्यालयाच्या सामाजिक बांधिलकीचे प्रभावी दर्शन घडले.


